Tuesday 19 March 2019

प्रतिमा सुधारण्याची सौदीची खटपट

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी नुकताच पाकिस्तान, भारत आणि चीनचा दौरा केला. बिन सलमान यांचा हा पहिला भारत-पाकिस्तान दौरा. डोळे दिपवणारा थाट, कडक सुरक्षाव्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत करताना यजमान देशाने न सोडलेली कसर, उंची गाड्या आणि शेकडो कोटी डॉलरचे व्यापार, गुंतवणुकीचे फुगे बाजूला ठेऊन त्यांच्या दौऱ्याने काय साधले हे पाहणे गरजेचे आहे.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरु करायला सुरु केली असतानाच, बिन सलमान यांनी पाकिस्तानात जाऊन भरघोस रोकडीचे आश्वासन देणे हे बाब सांकेतिक आहे. भारत भेटीत त्यांनी दहशतवादाविरोधात लढाईस सौदी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले असले तरी पुलवामाचा उल्लेख टाळला आहे. पाकिस्तानचा विचार करता, त्या भूमीवरून गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या दहशतवादी गटांनी भारतात आणि इराणमध्ये हल्ला केला आहे. अशा संवेदनशील काळात बिन सलमान येणे ही इम्रान खान यांच्यासाठी सुखद घटना आहे. भारत सरकार पुलवामाचे प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असताना आपण अजून मित्र राखून आहोत असा संदेश इस्लामाबादने त्यातून दिला आहे. 'कोणासमोर पैशांसाठी कटोरा घेऊन जाणार नाही' अशी प्रचार सभांमध्ये गर्जना करून पंतप्रधानपदी 'बसवलेले' इम्रान खान पाकिस्तानच्या काळवंडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी 'कर्ज द्या' म्हणून दोन वेळा सौदीला जाऊन बिन सलमान यांचे दार ठोठावून आले. निर्विवाद सत्ता गाजवत असलेले बिन सलमान हे सौदीत सगळे निर्णय घेतात. राजे सलमान यांच्या वाढत्या वयामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आली आहे. इतर अनुभवी आणि वयाने ज्येष्ठ असलेल्या राजपुत्रांना न जुमानता बिन सलमान सौदीचा गाडा रेटत आहेत. त्यामुळे, शंकरापेक्षा नंदीलाच जास्त महत्त्व आल्यासारखी ही गोष्ट आहे. जगभर त्यांचे सुरु असलेले दौरे, बड्या नेत्यांच्या गाठीभेटींतून सौदी म्हणजे फक्त बिन सलमान ही बाब स्पष्ट होते. तब्बल २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करू असे परवा बिन सलमान यांनी पाकिस्तानात जाहीर केले आहे. असाच मोठा आकडा त्यांनी भारतात जाहीर केला. पण, जाहीर करणे आणि प्रत्येक्ष पैसे ओतणे यात फरक असतो. इम्रान खान मात्र बिन सलमान आणि इतर गब्बर श्रीमंत असलेल्या अरब युवराजांचे अगत्य करण्यात मश्गुल आहेत. तेलाचा अस्थिर बाजार आणि सौदी अर्थव्यवस्थेची तेलावरची मदार कमी करणे हे डोक्यात ठेऊन बिन सलमान इतर पर्याय शोधत आहेत. पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने आकारास आलेल्या आंतरराष्ट्रीय सौर संघटनेत बिन सलमान आणि सौदीने प्रत्यक्षपणे सहभागी होणे ही महत्त्वाची बाब आहे.

सौदी आणि पाकिस्तानचा जुना दोस्ताना आहे. १९५१च्या मैत्री करारानंतर त्यांची दोस्ती बहरली आहे. आर्थिक पेचात, राजकीय तणावाच्या वेळी, भूकंप असो वा पूर, सौदी कायमच पाकिस्तानच्या मदतीला धावला आहे. तालिबान राजवट अधिकृतपणे मान्य करण्यात संयुक्त अरब अमिराती सोबत सौदी आणि पाकिस्तान देखील होते. पाकिस्तानच्या बहुतेक आजी-माजी नेत्यांचा सौदीसोबत घरोबा आहे. जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीत तत्कालीन विरोधी पक्ष नेता असलेले नवाझ शरीफ यांना पाकिस्तानातून हद्दपार केल्यांनतर ते सौदीच्या आश्रयाला गेले होते. पूर्वी, सौदीचे राजे फैझल बिन अब्दुल अझीझ इब्न सौद यांनी पाकिस्तानला बक्कळ मदत केली होती. त्यांच्या या मदतीचा मान राखत नंतर लियालपूर या शहराचे नाव पाकिस्तान सरकारने फैझलाबाद असे बदलले. २०१५मध्ये येमेनच्या लढाईत इराण पुरस्कृत गटाचा बिमोड करण्यासाठी सौदीने समस्त सुन्नी देशांची फौज गोळा केली. त्याला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी खोडा घातला होता. आता शरीफ यांच्यानंतर गादीवर आलेल्या इम्रान खान यांच्याकडून बिन सलमान त्या सुन्नी देशांच्या कंपूत पाकिस्तानच्या सहभागाची अपेक्षा आहे. राजकारणात कोणीच कोणाला असे काही फुकट देत नाही. इम्रान खान यांचे सरकार तर आधीच चीनच्या अशाच राक्षसी गुंतवणुकीच्या ओझ्याखाली दबले गेले आहे. सौदी पैसे टाकून बिन सलमान पाकिस्तानची आर्थिक नरडी आपल्या ताब्यात घेऊ पाहत आहेत. कितीही केले तरी अधिकृतपणे अणुबॉम्ब असलेला पाकिस्तान हा एकमेव मुस्लिम-बहुल देश आहे.

२०१७ साली सौदीचे राजे सलमान यांनी ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, मालदीव, चीन आणि जपानचा दौरा केला होता. देवाण-घेवाण आणि गुंतवणुकीचे अनेक करार या दौऱ्याच्या दरम्यान झाले होते. किंबहुना मालदीव, इंडोनेशीया, मलेशियातील गेल्या काही दशकांच्या सौदीच्या गुंतवणुकीला धार्मिक रंग आहे. सौदी पैशांमुळे उपकृत झालेले हे देश आणि त्यांची अर्थव्यवस्था आतून पोखरली गेली आहे. वहाबी जिहादचा प्रसार सौदी या सगळ्या पैशांच्या जोरावर जगभर पसरवतो आहे. तोच कित्ता बिन सलमान यांनी पाकिस्तानात गिरवला. आशिया खंडाच्या पूर्वेतील मैत्रीसंबंध सौदीच्या परराष्ट्रीय धोरणाचा भाग आधीपासून आहेतच. त्याची चिंता बिन सलमान यांना कधीच नव्हती. मात्र, जमाल खशोगी यांच्या हत्येनंतर पाश्चात्य देशांनी त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर संशय घेत त्यांच्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. याचा प्रत्यय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अर्जेन्टिना येथे भरलेल्या 'जी-२०' परिषदेत बघायला मिळाला. खशोगी प्रकरणानंतर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या देशांत त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय राळ उडाली. या राष्ट्रांमधील सौदीची गुंतवणूक, आर्थिक हित आणि सौदी तेलाचे महत्त्व पाहता ते बिन सलमान यांना पूर्ण वाळीत टाकतील अशी अजिबात शक्यता नाही. पडद्याआडून त्यांचे सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेतच. पण त्याच वेळेस, या पाश्चात्य देशांपैकी उघडपणे कोणी आपल्या गळ्यात गळा घालणार नाही याची जाणीव बिन सलमान यांना आहे. चार महिने उलटून गेल्यानंतरही जमाल खशोगी प्रकरणाचे भूत आपला पिच्छा सोडत नाहीये. त्यामुळे, इतर सौदी राजपुत्र आणि भाऊबंदांना बाजूला फेकत घरच्या आघाडीवर सुसाट निघालेल्या त्यांच्या रथाची गती आंतरराष्टीय घडामोडींचा विचार करता धीमी झाली आहे. एकाकीपणाची ही जळमट बाजूला करताना, जागतिक पातळीवर सुरु असलेल्या या उपेक्षेला छेद देत आपण मित्रहीन नसल्याचे संकेत त्यांना द्यायचे होते. तसेच, दबावाला न जुमानता, कच न खाता आपण काम करू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्याने साध्य झाले आहे. मित्रत्वाला नव्याने मुलामा देत ते आपली बाजू पक्की करत आहेत. पाकिस्तान, भारत, चीन या देशांच्या दौऱ्याबाबत आणि त्याच्या फलिताबाबत बिन सलमान यांना संशय नव्हताच. आपला प्रभाव फक्त अधोरेखित करायचे परिमाण या दौऱ्याला होते. सवंग राजकीय फायदा पाहता त्यांचे पोट कायम भरलेले होतेच, या दौऱ्यात वाईट प्रसंगाची तजवीज करून मात्र त्यांनी तृप्तीचा ढेकर तेवढा दिला आहे.