Sunday 22 June 2014

'अ'शांततेचा प्रहर...

या पृथ्वीवर काही देश असे आहेत ज्यांच्या नशिबी कायमचं अस्थिरतेचे काळे ढग दाटून आले आहेत. डोक्याला ताप देणारे शेजारी देश, बलाढ्य राष्ट्रांची कामापुरती पसंती, आंतरराष्ट्रीय देशांच्या पंक्तीत सावत्र वागणूक, त्यांच्याकडून होणारा पराकोटीचा दुस्वास आणि पुढारलेल्या राष्ट्रांच्या राजकारणाचं भांडवल हेच या देशांच्या पत्रिकेत मांडून ठेवलं आहे असं वाटण्याइतपत हलाखीचे दिवस हे देश काढत आहेत. मध्य-आशियाई देशांचा, तेथील भूगोलाचा, त्यांच्या व्यापारिक दृष्टिकोनाचा आणि क्षमतेचा, त्यांच्याकडील निसर्गसंपत्तीचा आणि त्यांच्या राहणीमानाचा विचार केल्यास या गोष्टी ठसठशीतपणे डोळ्यासमोर येतात.
एकमेकांना खेटून उभे राहिलेल्या बांबूच्या झाडांप्रमाणे खेटून अगदी चिकटून असलेल्या अफगाणिस्तान, इराण, इराक, सिरीया, सौदी अरेबिया, जॉर्डन, लेबेनॉन, सुएझ कालवा आणि इस्रायल वजाकरून असलेला इजिप्त आणि लिबिया या देशांच्या रांगेत, त्यांच्या जन्मापासून, आखणीपासून आणि त्यांवरच्या हक्काच्या दावेदारीपासूनचं पाचवीला करंटेपणचं पूजलयं. एका पाठोपाठ एक, अश्या असंख्य काळ-रात्रींनी या देशांच्या दुर्दैवात आणखीनचं भर घातली आहे. लोकशाहीच्या सांगाड्यात, एकमेकांचे गळे घोटत, नको तिथे दाखवलेला कट्टरपणा आणि एकूणचं जगाचं, आजू-बाजूच्या परिस्थितीचं अवलोकन न करू शकल्यामुळे हे असे दिवस त्यांच्यावर आले आहेत. या सगळ्यांमध्ये सडकून, तुंबळ युद्धांमध्ये बदडून निघालेला देश म्हणजे इराक.

इराक जन्माला आला तेव्हापासूनच या देशाची गणितं बिघडत गेली. कायम वादाचा मुद्दा असलेला हा देश म्हणजे शियाबहुल मुसलमानांना प्रिय असलेल्या देशांपैकी एक. बाथ पार्टीच्या नेत्यांपैकी एक असलेल्या सद्दाम हुसेन यांनी १९७० पासून आपल्या हाती ताकद एकवटून घ्यायला सुरुवात केली. त्यांनी बहुतौंशी इराकी तेल कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करून टाकलं. इराण-इराक युद्ध आणि त्याचे परिणाम भोगत असताना अमेरिका देत असलेल्या आर्थिक मदतीचा आणि शस्त्रांचा योग्य वापर करून त्यांनी १९७९च्या सुमारास सत्ता काबीज केली. बक्कळ तेलसाठ्यांमुळे हातात खेळणारा मुबलक पैसा आणि सत्तेची नशा या दोन्ही गोष्टींच्या सांगाडीने त्यांनी सरकारी पदांवर, लष्करात आणि मोक्याच्या जागांवर त्यांच्या पंथाच्या म्हणजेच सुन्नी पंथाच्या लोकांची दणकून भरती केली. तोपर्येंत आणि अजूनसुद्धा इराकमध्ये सुन्नी पंथाची लोकसंख्या इराकच्या एक पंचमांश आहे. शिया आणि कुर्द पंथीयांची सगळी आंदोलनं, आणि त्यांचे सत्ता काबीज करण्याचे सगळे डाव सद्दाम यांनी धुडकावून लावले. त्यांनी उत्तरोतर या गटांचं शब्दश: शिरकाण केलं. या दोन्ही पंथांच जमेल तिथे खच्चीकरण सद्दाम करत राहिले आणि त्याच वेळी या चिरडल्या गेलेल्या गटामध्ये सद्दाम आणि सुन्नी विरोधाची ठिणगी पडली. तब्बल २४ वर्षांच्या राजवटीत, या ठिणग्या वाढत गेल्या, धुमसत गेल्या आणि शेवटी या सगळ्या अन्यायाचा उद्रेक होऊन इराकमध्ये वणवा पेटला. या सगळ्या वेळात अमेरिका नेहमीप्रमाणेच आपल्या सोयीचं राजकारण करत आली. थोरल्या जॉर्ज बुश यांच्या हातात इराक आणि सद्दाम आला असतानासुद्धा तेलाच्या सोयीसाठी सद्दामला सोडून देण्यात आलं.
याच गोष्टीमुळे सद्दामची मुजोरी वाढतच गेली. ९/११ च्या हल्ल्यानंतर खडबडून जागं झाल्यावर आणि इराकी जनतेच्या नाराजीचा फायदा घेत अमेरिकेच्या थोरल्या जॉर्ज बुश यांच्या मुलाने, इंग्लंडच्या टोनी ब्लेयर यांना सोबतीला घेऊन इराकवर २००३ साली हल्ले चालू केले. राजकीय जाणकार असं सांगतात की राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी जरी इराक आणि सद्दामवर रासायनिक, आण्विक, जैविक अस्त्रांचा आणि अल-कायदाशी संबंध असल्याचा ठपका ठेऊन हल्ले चालू केले होते तरी या हल्ल्यांमागे खरं कारण हे तेल होतं. १९६३ साली इराक सोबत करण्यात आलेल्या तेलाचा करार बरोब्बर ४० वर्षांनंतर २००३ साली संपणार होता, आणि म्हणूनच इराकवर यथेच्छ गोळीबार आणि बॉम्बवर्षाव करून इराकी तेल विहिरी आपल्या ताब्यात घेऊन आपली हुकुमत जगात पुन्हा सिद्ध करायची हाच प्रमुख उद्देश ठेऊन हे हल्ले करण्यात आले. 

सद्दाम राजवट मुळापासून उखडून टाकत आणि इराकी जनतेचं आयुष्य नामोहरम केल्यानंतर अमेरिकेने इराकमध्ये लोकशाही स्थापन करण्याचा डंका पिटत, सद्दाम हुसेनना शोधण्यासाठी जंग-जंग पछाडलं. डिसेंबर २००३ मध्ये सद्दामना पकडण्यात आलं आणि मे २००६ मध्ये अमेरिकेच्या पाठींब्यामुळे नुरी अल-मलिकी हे शिया पंथाचे प्रतिनिधित्व करणारे नेते, इराकच्या पंतप्रधानपदी निवडले गेले. सद्दामना डिसेंबर २००६ मध्ये फाशी देण्यात आली आणि एका पर्वाचा अंत होत असतानाच दुसरं, तितकंच संहारक पर्व दत्त म्हणून इराकच्या नशिबी उभं राहिलं. सत्तेवर आल्यानंतर मलिकी यांनी सद्दामचीच वाट अवलंबली आणि सरकारमध्ये, लष्करात शिया पंथाची वारेमाप भरती सुरु केली. इतके वर्ष सद्दाम आणि सुन्नी लोकांकडून झालेल्या जाचाला, अमानुष कत्तलीला वाट मिळाली आणि सुन्नी पंथाची एकच गळचेपी सुरु झाली. गेल्या वर्षापर्येंत इराकमध्ये ठाण मांडून बसलेल्या अमेरिकेने नवीन सरकारला आणि लष्कराला तयार करण्याच्या पुरता प्रयत्न केला. पण मेंदूत भिनलेल्या सुडाच्या दबावापोटी इराकमधली परिस्थिती अराजकाताच्या अस्थिर वाटेवर मुक्तपणे वावर करू लागली आणि इथेच, अगदी याच काळात अल-कायदा बाळसं धरून, गुटगुटीतपणे वाढून, बेधुंद तारुण्याची नशा अजमावू लागली. 'अल-दवलाह अल-इस्लामीयाह फि अल-इराक वा-अल-शम' किंवा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (ISIS) हे याच अल-कायदाचं लहान, पण तितकंच प्रभावशाली, शक्तिशाली, श्रीमंत आणि क्रूर भावंड!

​​

२-३ वर्षांपासून सिरीयामध्ये सुरु असलेल्या युद्धाला तोंड देत, सिरियाच्या प्रमुख बशर अल-असाद यांच्या विरोधातल्या नाराजीचा फायदा घेत आणि सुन्नी पंथाचं भलं करण्याच्या दृष्टीने अल-कायदामधला ISIS गट कामाला लागला. ओसामा बिन लादेननंतर  अल-कायदाच्या नेतृत्वाशी तात्विक मतभेद झाल्यामुळे जून २०१३ मध्ये एक गट बाहेर पडला आणि 'आयएसआयएस'चा जन्म झाला. हा गट त्याआधी इराकमध्ये अल-कायदाचं काम बघायचा. अबू बकर अल-बगदादी या चाळीशीच्या टप्प्यात असलेल्या आणि फक्त दोन छायाचित्र प्रसिद्ध असलेल्या नेत्याच्या चिथावणीला बळी पडून 'आयएसआयएस' च्या दहशतवाद्यांनी सिरीयामध्ये रान पेटवलं. अमेरिका, सिरीया आणि 'आयएसआयएस' सारख्या धार्मिक मूलतत्त्ववाद्यांमुळे गेल्या २-३ वर्षांमध्ये आजपर्येंत सिरीयामध्ये सुमारे पाऊणे दोन लाख निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. इराकच्या डोक्यावर असणाऱ्या सिरियाच्या दमस्कस आणि आलेप्पो शहरांमध्ये हाहाकार माजवून 'आयएसआयएस'ने आपले रंग केव्हाच दाखवले होते. आणि तिकडूनच उत्तर इराकमध्ये घुसून सुन्नी प्राबल्य भाग झटपट आपल्या ताब्यात घेऊन ही संघटना गब्बर होत गेली. इतर दहशतवादी संघटनांपेक्षा जरा फटकून वागणारी, थोडी वेगळीच कार्यपद्धती असणारी, आत्ताच्याघडीची 'आयएसआयएस' ही एकमेव संघटना आहे. गेल्या २० दिवसांपासून 'आयएसआयएस'ने इराकमध्ये एकच गोंधळ माजवला आहे. मोसुलसारख्या महत्वाच्या आणि आकाराने दुसऱ्या क्रमांकाच्या शहराचा ताबा फक्त ३ दिवसांमध्ये घेत त्यांनी आपली ताकद स्पष्टपणे दाखवून दिली. त्याचबरोबर इराकी सरकारचं, लष्कराचं दुबळेपण आणि खचलेलं मनोधैर्य जगासमोर पुढे आणलं. सुन्नी लोकांचा उत्कर्ष हा जरी 'आयएसआयएस'चा हेतू असला तरी इराकमधील तेल हेच त्याचं प्रमुख लक्ष्य आहे. तब्बल १० हजार हून जास्त निर्ढावलेले, डोक्यावर भूत बसलेले, धार्मिकरित्या अंध झालेले राक्षशी प्रवृत्तीचे तरुण पोसायचे म्हणजे की खायचं काम नाही. त्यांचा सांभाळ करायला लागणारा पैसा हा तेलातूनच येणार हे ताडून  'आयएसआयएस'ने आपला मोर्चा तेलाच्या विहिरींवर आणि तेल शुद्धीकरण केंद्रांवर वळवला. जवळपास ३६ लाख तेलाचे बॅरल इराक रोज बाजारपेठेत आणू शकतं. जगातल्या मोठ्या तेलसाठा असलेल्या देशांमध्ये इराकचा पाचवा क्रमांक आहे आणि 'ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोरटिंग कंट्रीस' (OPEC) मध्ये तेल उत्पादन करणारा सौदी अरेबियानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या सगळ्या प्रकरणामुळे जगभरात तेलाचे भाव भडकले आहेत. बैजीची तेल शुद्धीकरण कंपनी  'आयएसआयएस'ने जवळपास ताब्यात घेतली आहे. आता त्यांचं लक्ष्य इराकची राजधानी बगदाद आहे. आजपर्येंत बगदादपासून केवळ ४ लहान शहरं लांब  'आयएसआयएस' येउन थडकलं आहे. इराकी लष्कराला आता सर्वात नेटाने प्रतिकार इथेच आणि दक्षिण इराकमध्ये करावा लागणार आहे. इराकचे सर्वात मोठे तेलसाठे त्याच भागात आहेत.  'आयएसआयएस'ने सद्दामची जन्मभूमी आणि दफनभूमी तिक्रीत आधीच आपल्या खिशात घातली आहे. मोसुलच्या धुमश्चक्रीमध्ये त्यांनी 'मोसुल सेन्ट्रल बँक' लुटून जवळपास ४० कोटी अमेरिकी डॉलर आणि सोन्याच्या तुंबड्या आपल्या दावणीला बांधले आणि म्हणूनच  'आयएसआयएस' आत्ता सगळ्यात श्रीमंत दहशतवादी संघटना आहे!! आपल्या पुढच्या हालचालींचा थांगपत्ता न लागू देता, मध्ये येईल त्याला अडवा करत आपला मार्गक्रमण करणे हेच  'आयएसआयएस' करत आली आहे. भरमसाठ शस्त्रास्त्रे, अत्यंत क्रूर पद्धत आणि त्याच्या जोडीला अत्यंत आधुनिक प्रचार-तंत्र  संघटनेने जोपासलय.
भरदिवसा इराकी लष्कराचा सामूहिक कत्ले-आम करताना, स्थानिक पोलिस अधिकारी आणि त्याच्या कुटुंबाचा खून करताना, तडतडत्या उन्हात, वाळवंटात एका बड्या लष्करी अधिकाऱ्याची आणि त्याच्या मुलाची कबर त्यांच्याकडूनच खोदून घेताना आणि त्यांचा गळा कापतानाचे छायाचित्र आणि छायाफिती ही संघटना मुक्तपणे इंटरनेटच्या माध्यमातून जगापुढे मांडत आहे. 'आयएसआयएस' दस्तैवज करण्यात अग्रेसर मानली जात आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे ही संघटना दर वर्षाला आपले अवहाल जाहीर करते. २०१३ मध्ये १० हजार चकमकी त्यांनी घडवून आणल्या ज्यात १०८३ लोकांचा बळी घेतला. खून, दरोडा, अपहरण, सामुहिक कत्तल अश्या १४ गटांमध्ये विभागणी केलेले गुन्हे आकड्यांच्या स्वरूपात त्यांनी जाहीर केले आहेत! त्यांचा नेता अल-बगदादी, ज्याला आता नवा बिन लादेन म्हणून लोक ओळखू लागले आहेत आणि ज्याच्या शिरावर अमेरिकेने एक कोटी अमेरिकी डॉलरचं बक्षीस ठेवलं आहे तो स्वतः जातीने नेतृत्व करतो असं लष्करी विश्लेषक सांगत आहेत. त्याचप्रमाणे या संघटनेची कार्यपद्धती लष्करापेक्षा सरस आणि शिस्तबद्ध आहे. मोसुल हेच आता त्यांचं शक्तिस्थान असेल यात वाद नाही. समविचारी सुन्नी कैदी आणि तरुण झपाट्याने  'आयएसआयएस'च्या मांडवात दाखल होत आहेत. त्यांना शिया आणि कुर्दविरोधी गटाकडून आणि सद्दाम हुसेन समर्थक गटाकडून रसद मिळत आहे हे अगदी उघड आहे.  



आता शिया, सुन्नी आणि कुर्द भागांमध्ये इराकचे ३ तुकडे होऊ घातले असताना मलिकी आणि त्यांच्या सरकारने अमेरिकेचे पाय पुन्हा धरले आहेत. अमेरिकेकडे लष्करी आणि हवाई मदतीची मागणी करताना त्यांच्या अवघड स्थितीची जाणीव होते. ओबामांनी आपण कुठल्याही कारणासाठी आता इराकमध्ये लष्कर धाडणार नाही हे परवाच जगाला सुनावलं आहे. अमेरिकेत त्यांच्या पर-राष्ट्रीय धोरणात त्यांचीच गोची झाल्यानंतर हे असे मोठे निर्णय ओबामा सहजा-सहजी घेणार नाहीत.
ओबामा आता कात्रीत सापडले आहेत. त्यांनी लष्कर इराकमध्ये पाठवलं तर ते अमेरिकेत खपवून घेतलं जाणार नाही, आणि जर ते लष्कर 'आयएसआयएस' विरोधात इराक मध्ये उतरलंच तर सुन्नी समुदाय, ज्यांचं अमेरिकेवरून आधीच पित्त खवळलं आहे, ते शांत बसणार नाहीत. सध्यातरी ओबामा ३०० अमेरिकी लष्करी सल्लगार इराकमध्ये पाठवणार आहेत. हे इराक युद्द पूर्णपणे शांत व्हावं हाच त्यांचा कटाक्ष आहे. त्यांची हीच कामगिरी त्यांना होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये मिरवता येणार आहे. बाकी त्यांचं पर-राष्ट्रीय धोरण आता कुठे आणि कसं अडकलं आहे हा एका स्वतंत्र लेखनाचा विषय आहे! हे असेच लष्करी सल्लगार पाठवणं म्हणजे आगीशी खेळ असतो, या खेळाचं युद्धात रुपांतर व्हायला काडीमात्र वेळ लागत नाही. ही अशीच छोटी लष्करी सल्लामसलत कोरियामध्ये तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष तृमान यांच्या अंगाशी आली होती ज्यात तीन वर्ष, ३० हजार लोकांचा जीव आणि त्याचंच सरकार गेलं होतं. हीच गोष्ट व्हिएतनामच्या बाबतीत झाली. परमेश्वर करो आणि आपल्यावर ही वेळ न येवो हीच अपेक्षा ओबामा करत आहेत. 

​भारताच्या दृष्टीनेदेखील हे प्रकरण बरंच मोठं आहे. १० हजारहून अधिक भारतीय इराकमध्ये काम करतात आणि भारतात दरवर्षी येणारं २ कोटी टन तेल हे इराकमधून येत. हे आकडे आपल्या दृष्टीने पुरेसे बोलके आहेत. या आखाती देशांचा विचार केल्यास, जगातल्या बहुतेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या आपल्या हाती असतानासुद्धा, केवळ या गोष्टीची जाणीव किंबहुना गांभीर्य नसल्यामुळे, प्रचंड ताकदवान असूनसुद्धा हे देश आज इतर देशांच्या हातातले खेळणे होऊन बसले आहेत. एका फटक्यात जगाचं नाक दाबून तोंड उघडण्याची करामत करू शकणारे हे देश, एकजुटीच्या अभावामुळे आज मागास देशांच्या गणतीत मोजू जाऊ लागले आहेत. वास्तवाकडे पाहता अर्ध्याहून अधिक इराकी जनतेने आपले संसार सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केली आहे. त्यांची फरफट आणि पांगापांग तर केव्हापासूनचं चालू झाली आहे. गेल्या कित्येक पिढ्यांची आणि त्यांच्या आयुष्याची संपूर्णपणे वाताहत सुरु आहे. बेरोजगारी, रोजची युद्धजन्य वेळ, उपासमारी आणि भकास वातावरणात नव्या इराकी पिढीचा जीव आकसून गुदमरतोय. त्यांचं ऐकून घायला कोण तयार होणार हा आत्ता त्यांच्यासमोरचा यक्षप्रश्न आहे. अंधारलेल्या अवस्थेत रोज येईल तो दिवस ते मुकाट्याने ढकलत आहेत. एकाबाजूला विकासाचे उंचच-उंच मनोरे आपण बांधत असताना जगात या अश्या जनतेचा भरणा जास्त आहे ही बाब मनाला चुकचुकायला लावणारी आहे. या सगळ्या आखाती पट्ट्यावर ३ '' राज्य करतात असं म्हटलं जातं. पहिला 'अ' - ल्लाह, दुसरा - र्मी आणि तिसरा - मेरिका. पण या अश्या बिकटवेळी या तिघांपैकी कोणीच सामान्य प्रजेच्या मदतीला येत नाही हे पाहून चौथा, अधिक वेदनादायक, जास्त वेळ टिकणारा '' या लोकांपुढे एकच ब्रम्ह-पर्याय पुढे आला आहे...तो म्हणजे  ''शांततेचा प्रहर...

                                                                                                                                               वज़ीर