Wednesday 19 June 2013

नव्या बाटलीत जुनीच दारू ???

अंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की काही देश हे जगासाठी डोकेदुखी ठरावेत यासाठीच निर्माण झाले आहेत. या देशांच्या यादीत इराणचा क्रमांक नक्कीच वर आहे. तेलाचं राजकारण आणि त्याच्यामुळे होणारे वाद या मध्ये इराण कायमच आघाडीवर राहिला आहे. बाकी इराणचा इतिहास काही काळ बाजूला ठेऊन सद्यस्तिथिचा विचार केल्यास इराण, त्याचे राज्यकर्ते आणि त्यांची वर्तमान धोरणं जगाला खूप काही भोगायला लावू शकतात हे नक्की आहे. 


इराणचे राज्यकर्ते नेहमीच लोकशाही आणि धर्माचा प्रचार करणाऱ्यांच्या कात्रीत सापडतात. त्याला मोहम्मद अहमदजीनेदाद हे अपवाद नव्हते आणि आता निवडून आलेले हसन रोहानी पण नाहीत. जगातले काही पेच हे सुसंवादानेच सुटू शकतात हे वास्तव आहे. या वास्तवाची जाण हल्लीच्या काही निवडक राज्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते. बराक ओबामा हे त्यातलं अग्रस्थानी असलेलं नाव. हसन रोहानी हे काहीप्रमाणात त्याच विचाराचे. राष्ट्रप्रेम आणि त्याचं अवडंबर यात एक अस्पष्ट रेघ असते. या रेषेची पुरती जाण असणारे नेते म्हणजे रोहानी. म्हणूनच जगाशी किंबहुना अमेरिकेशी चर्चेचा मार्ग सोयीस्कर आहे  या विचाराच्या रोहानींना इराणची राष्ट्रपतीपदाची निवडणूक एक आव्हानच ठरली. जवळपास सगळे कट्टरपंथी, इराणचे सर्वेसर्वा खामेनी आणि स्वतः मावळते राष्ट्राध्यक्ष अहमदजीनेदाद यांचा रोहानी यांना विरोध होता.  जागतिक राजकारणाच्या पटलावर अहमदजीनेदाद यांचं नाव एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेच. पण, त्यांना देशांतर्गत विरोधपण तितकाच होता. थेट राष्ट्रपतीपदाचाच जुगाड करणाऱ्या अहमदजीनेदाद यांना समंजस इराणी जनतेनेच दूर केलंच होतं आणि त्यात भरीस- भर म्हणून न्यायालयाने अहमदजीनेदाद यांना यंदाची निवडणूक लढवण्यास बंदी घातली. याच अहमदजीनेदाद यांनी गेली काही वर्ष अमेरिकेच्या नाकात दम केला होता. जगभरातून टीकास्त्र आणि तुफान विरोध होत असतानासुद्धा, तो विरोध म्हणजे पाठींबा आहे अशा थाटात अहमदजीनेदाद आपलं अणूशस्त्र धोरणाचं घोडं पुढे रेटत होते. 
रोहानी यांचा विजय आणि त्यानंतर इराणी युवकवर्गाने केलेला जल्लोष खूप काही सांगून जातो. हाच युवकवर्ग पाच वर्षांपूर्वी २००९ झालेल्या राजकीय चिखलामुळे रस्त्यावर उतरला होता. 



पण, वाळवंटात तेल कुठे लागेल आणि तिथले राज्यकर्ते कसे रंग बदलतील याचा नेम नाही. त्यामुळेच काही राजकीय विश्लेषक रोहानी यांच्या पावलांकडे सावधगिरीच्या नजरेने पाहत आहेत. पर-राष्ट्रीय धोरणासाठी लागणारी सावधगिरी आणि वाऱ्याच्या दिशेने गोष्टी हाताळायचं कसब रोहानी यांच्याकडे ठासून भरलंय. २००३  ते २००५ च्या दरम्यान इराणकडून अमेरिकेशी बोलणी करण्यासाठी रोहानीच आघाडीवर होते. आपल्यातला कट्टर इस्लामवादी आणि त्याच्या जोडीला कायद्याचं ञान या रोहानिंच्या जमेच्या बाजू आहेत. इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम चालूच ठेवणार हा निर्धार रोहानी यांनी केलाच आहे, पण इराण वाटाघाटी करण्यासाठीच्या काही अटी शिथिल करेल असा समंजसपणा रोहानी यांनी दाखवला आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की इराणचं पर-राष्ट्रीय धोरण आणि अण्वस्त्र कार्यक्रम हे अजून तरी आयतुल्ला अली खामेनी जे की इराणचे सर्वेसर्वा आहेत हेच ठरवतात.


अमेरिकेने लादलेले आर्थिक निर्बंध आणि इराणी जनतेची त्यातून होणारी पिळवणूक या मुख्य गोष्टींची किनार रोहानी यांच्या समंजसपणाला आहे याचा विसर नको.  रोहानी यांच्याकडून काही जादू घडेल अशी अपेक्षा बाळगण्यात मूर्खपणा आहे, पण त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व आणि त्यांचे शिस्तप्रिय विचार पाहून रोहानी, अहमदजीनेदाद यांच्यापेक्षा कमी जहाल मार्ग स्वीकारतील असा कयास आहे.  त्यामुळेच रोहानींचा शांततापूर्ण अणू कार्यक्रम खोमेनींच्या जहालवादी कार्यशैलीवर कशी मात करेल हे बघणं औत्सुख्याचं ठरणार आहे. पण, तूर्तास तरी रोहानी जगाबरोबर शांततेचे संबंध प्रस्तापिथ करण्यावर भर देतील असा भाबडा आशावाद बाळगणे आणि त्यासाठी निकारीचे प्रयत्न करणे यातच सगळ्यांचं भलं आहे. हाच शहाणपणा त्यांचे विरोधक दाखवतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर अशा सुडाच्या राजकारणाला बळी पडलेल्या सामान्य इराणी जनतेसाठी सगळंच अवघड आहे... 

                                                                                                                                                                              - वज़ीर     

Friday 7 June 2013

ये दिल्ली है मेरे यार...

 
(शुक्रवार१ मार्च, २०१३, सकाळी ११  ते  १.१० वाजेपर्येंत)

पुण्यात विमानात बसलो आणि दिल्लीच्या तख्ताकडे कूच केली. शांत, संथ आणि किंचित हळू वाटणाऱ्या अशा गतीने विमान पुढे सरकत होतं. लहानपणी हवेत तरंगणाऱ्या परीची गोष्ट आठवली. आम्ही सगळे तोच अनुभव तर घेत नव्हतो ना? काय वाटलं कोणास ठाऊक एकदम वळून मी मित्रांकडे पाहिलं, सगळे विमानाच्या खिडकीतून बाहेर बघण्यात रमून गेले होते. एखाद्या लहान मुलाला नवीन खेळणं दिल्यावर तो ज्या आत्मीयतेने ते खेळणं बघत असतो तीच गोष्ट काही प्रमाणत आम्हा ६ लोकांबरोबर घडत होती. बाकीचं पूर्ण विमान आणि त्यातले प्रवासी दादर - सीएसटी लोकल प्रवास करावा असे आरामात बसले होते, किंवा तसे भासवत होते!!!

वैमानिक सांगत होता आता आपण २०,००० फुटांवरून चाललो आहोत, तापमान, हवेची गती, प्रेशर इत्यादी, इत्यादी. एव्हाना महाराष्ट्र सोडला होता, गुजरात ओलांडलं होतं, वरून काहीच समजत नव्हतं. असं करत करत उदयपुरवरून चाललो असल्याचं वैमानिक म्हणाला, काहीच कारण नसताना वाळवंटाची वाट तुडवल्याची समजूत करून घेत होतो. खालचं काहीच दिसत नव्हतं, दिसणारही नव्हतं. 

अंतिम टप्पा नजरेत येणार होता. दिल्ली खुणावत होती. राजस्थान मागे पडलं होतं. मी म्हणणारं ते वाळवंट विमानाने काही मिनिटांमध्ये पार केलं होतं. एक विलक्षण संवेदना नसा-नसांत भिनत होती. एक नवं पण कित्येक पटींनी जास्त जुने संबंध असलेलं राज्य खुणावत होतं, ते तख्त खुणावत होतं, याच तख्तासाठी कित्येक संसार उघड्यावर आले, कित्येक जण हुतात्मे झाले, पण दिल्लीपर्येंत मजल गाठणाऱ्या मराठ्यांनी दिल्ली कधीच काबीज केली नाही, आजतागायत
तेच सिंहासन खुणावत होतं…त्याच्याजवळ चाललो होतो...

विमान उंचावरून डाव्या बाजूला खाली आलं, आणि दिल्लीचं पाहिलं दृश्य दिसलं. हिरवी दिल्ली. नितळ हिरवी. परमेश्वरासाठी हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा चौकोनात भरून ठेवाव्यात इतकं विहंगम. दिल्लीत इतकं पाणी आहे? हा टिपिकल पुणेरी प्रश्न पडला. लांब-लांबपर्येंत हिरवे पट्टे. नजरेत भरणारं दृश्य. विमान आणखी खाली येऊ लागलं, खाली येताना जणू मध्ये येणारे ढग चुकवू लागलं. पुन्हा एकदा दिल्ली, शाहरुख खान, रेहमान आणि स्वदेसची थिम ऐकू येऊ लागली. ज्या माणसाच्या काळजाला ती थिम थेट भिडलीये, त्याला ती थिम विमानात बसल्यावर नाही आठवली तर त्याने त्या विमानातून उडी मारून सरळ जीव द्यावा. पण, हे सुख काही काळच टिकलं. कारण नैसर्गिक दिल्लीतून शहरी दिल्लीकडे विमान जाऊ लागलं. पत्त्याची घरंच जणू..तुफान दाटी. माणसांची दाटी, गाड्यांची दाटी, घरांची दाटी. इतकी दाटी पाहून थक्क झालो. पुण्यातल्या बालाजीनगरची किंवा आंबेगाव सेक्टर १६ची आठवण झाली. ही आपल्या देशाची राजधानी आहे? कुचकट पुणेरी बाणा जागा झाला. रस्ते दिसू लागले, साचेबद्ध. चारचाकी गाड्यांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या, त्यासुद्धा एकमेकांना चिकटून-चिकटून थांबलेल्या. खऱ्या अर्थाने महानगर. तितकीच लोकसंख्या आणि तितकंच प्रदूषण. 

विमानतळ नजरेच्या टप्प्यात आलं. इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ. खरं सांगतो नाद खुळा. विमानतळावर शेकड्याने विमाने उभी होती. काही इथली आणि भरपूर बाहेरील देशांमधली. चकचकीत काळ्या धावपट्ट्या. त्यात काही खासगी चार्टर विमानं. कोणत्या नेत्याचं कोणतं विमान असा हळूच शोध घेऊ लागलो. दिल्ली खऱ्याअर्थाने राजधानी. अतिउच्च ताळ-मेळ. सगळं कसं सुरळीत चाललं होतं. साचणीबद्ध. केंद्र सरकार. 

आता पुणे मागे आणि दिल्लीत उतरलो. Safe landing. श्रीनगरच्या विमानाला २० मिनिटे होती. पटापट पळालो. काय विमानतळ आहे..आहाहा. असं वाटतंच नव्हतं आम्ही भारतात आहोत. उत्तम सोय-सुविधा, तत्पर सेवा, वेळेचं अन पैश्याचं महत्व, ही या विमानतळाची खासियत!!

श्रीनगरच्या विमानात बसलो. आता त्या गोष्टीचा सराव झाला होता. निर्ढावलो होतो. हात-पाय ऐस-पैस सोडून बसलो. पण, दिल्लीने मनात घर केलं होतं. परत खास दिल्ली बघायला येऊ ही खुणगाठ मनाशी बांधून सीट-बेल्ट बांधू लागलो…

रेहमान पुन्हा मनात डोकावू लागला...

'ये दिल्ली है मेरे यार, बस इश्क, मोहब्बत, प्यार…!'

                                                                                                                                           - वज़ीर